महाराष्ट्रात पुढच्या 24 तासांत कुठे जोरदार पावसाची शक्यता? जाणून घ्या कुठे काय अलर्ट

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढच्या 24 तासांत कोकण आणि घाट प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे.
तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
राज्यातल्या या सगळ्या विभागांत हवामान कसं राहील आणि कुठल्या जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट दिले आहेत? जाणून घेऊयात.
जुलैच्या सॅटेलाईट दृश्यांत पाहिलं, तर देशाच्या अनेक भागांत मान्सून सक्रीय असल्याचं लक्षात येतं.
राजस्थानच्या दक्षिण भागात, हरियाणा्च्या आसपास, मध्य प्रदेशच्या ईशान्य भागांत, छत्तीसगडमध्ये तसंच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्यांची चक्राकार पाहायला मिळते आहे.
या प्रणालींच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या घाट प्रदेशात आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. विशेषतः उत्तर कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता जास्त आहे.
बीबीसी वेदर फॉरकास्टनुसार, पुढच्या 24 तासांत कोकणातील जिल्ह्यांमध्ये तसंच घाट प्रदेशात काही ठिकाणी जोरदार ते अतीजोरदार पावसाची आणि काही वेळा सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
विदर्भातल्या काही भागांतही जोरदार ते अतीजोरदार पाऊस आणि विजांसह सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
तर मराठाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढचे 3-4 दिवस या परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. तर राज्याच्या अंतर्गत भागांत तुलनेनं कमी पाऊस पडू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या इशाऱ्यांनुसार 21 तारखेच्या उत्तरार्धासाठी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड हे जिल्हे, पुणे आणि साताऱ्याचा घाट प्रदेश तसंच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथे जोरदार ते अतीजोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
तर रत्नागिरी, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे. जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर इथेही मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.
22 तारखेला पुण्याच्या घाट क्षेत्रात हवामान विभागानं अतीवृष्टीसाठी रेड अलर्ट दिला आहे.
तर नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट प्रदेश, तसंच पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांत जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक आणि पुण्याच्या पठारी प्रदेशात जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.
विदर्भात सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जुलैच्या सुरुवातीला राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला, पण मग या महिन्याच्या मध्यावर मान्सूननं ब्रेक घेतला. आता पुन्हा मान्सून सक्रीय होतो आहे.
पण मराठवाडा आणि विदर्भातले बहुतांश जिल्हे, तसं मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसात मोठी तूट आहे. ती भरून निघणं राज्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या आठवडाभरातील पावसावर नजर ठेवावी लागेल.
हवामानाविषयीचे सर्व अपडेटस, माहिती आणि विश्लेषण तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवरही वाचू शकता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















