महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम, जाणून घ्या राज्यात कुठे-कुठे रेड अलर्ट जारी

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात पावसाचा जोर सलग पाचव्या दिवशीही कायम आहे. मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनाचा वेग मंदावला आहे.
भारतीय हवामान विभागाने आजही (5 जुलै) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून आजही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा इशारा 6 जुलैपर्यंत लागू राहणार आहे.
मुंबईसह रायगड, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांनाही आज पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
प्रतिकूल हवामानामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला असून आपत्कालीन परिस्थितीसाठी हेल्पलाइन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये आयएमडीने रेड अलर्ट जारी केलेल्या भागांची माहिती दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि पनवेलसाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही त्यांनी पोस्टद्वारे शअर केले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 4 ते 6 जुलैदरम्यान मुंबईसह उपनगरात, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक :
- बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC): 1916
- पालघर: 02525-297474 / +91 82379 78873
- ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
- ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
- पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42
पावसाची स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
विशेषतः सखल भागातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कारण मुसळधार पावसामुळे पाणी साचणे आणि स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सततच्या पावसामुळे रायगडमध्ये रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अंबा नदीनेही धोका पातळी ओलंडली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा, अनावश्यकपणे नदी, पूल किंवा पाण्याजवळ जाणे टाळावे, असं आवाहन केलं आहे.
कुलाब्यात 265.6 मिमी, डोंगरवाडीत 398 मिमी पावसाची नोंद
मुंबईसह राज्यातील घाटमाथा परिसरात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत कुलाबा येथे 265.6 मिमी, तर सांताक्रूझ येथे 227.7 मिमी पावसाची नोंद झाली.
या काळात कुलाब्यात किमान तापमान 24.4 अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझमध्ये 24.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

दरम्यान, घाटमाथ्यावरही अतिवृष्टीची परिस्थिती कायम असून अनेक ठिकाणी 200 ते 400 मिमीपर्यंत पाऊस झाला आहे.
माथेरानला मागील 24 तासांत 408 मिमी पाऊस कोसळला आहे. तर, डोंगरवाडी येथे 398 मिमी, भिरा येथे 386 मिमी, ताम्हिणी येथे 310 मिमी, खोपोली येथे 285 मिमी, शिरगाव येथे 275 मिमी, दावडी येथे 268 मिमी, लोणावळा येथे 263 मिमी, अंबोना येथे 249 मिमी, वालव्हण येथे 229 मिमी आणि कोयना (नवजा) येथे 210 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे घाटमाथा आणि मुंबई परिसरातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
खोपोली येथील धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुटका
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या खोपोली येथील प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची स्थानिक गावकऱ्यांनी सुटका केली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील नद्या आणि धबधब्यांची पाण्याची पातळी आणि प्रवाह लक्षणीयरित्या वाढला होता. असे असूनही, मोठ्या संख्येने पर्यटक झेनिथ धबधबा पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाल्याने 100 हून अधिक पर्यटक धबधब्याच्या परिसरात अडकले.

या घटनेची माहिती मिळताच, विहारी ठाकूरवाडी गावातील स्थानिक गावकरी घटनास्थळी पोहोचले आणि प्रसंगावधान व शौर्य दाखवून दोऱ्यांच्या साहाय्याने सर्व पर्यटकांना पाण्याच्या जोरदार प्रवाहातून सुखरूप बाहेर काढले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रीय
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली सक्रीय आहे. Wind and Rain maps – याच कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यात मान्सूनचा पाऊस वाढला आहे, कारण ही कमी दाबाची प्रणाली मान्सूनच्या वाऱ्यांना बळ देते.
BBC Weather 2 कमी दाबाचं हे क्षेत्र पुढे सरकेल, तसं पुढचे 4-5 दिवस कोकण, गुजरात आणि मध्यम प्रदेशातल्या काही भागात पाऊस बराच सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या 24 तासांत झालेला मुसळधार पाऊस आणि आणखी पावसाची शक्यता पाहता कोकणातील मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांत तसंच अहिल्यानगर आणि सोलापूरच्या काही भागांत फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनासारख्या घटनांचीही शक्यता आहे.
5 जुलैसाठी मुंबई, पालघर ठाणे तसंच पुण्याचा घाट प्रदेश आण साताऱ्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी रेड अलर्ट आहे.
नाशिकच्या घाट प्रदेशात तसंच रायगड, रत्नागिरी तसंच कोल्हापूरचा घाट प्रदेश इथे जोरदार पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
अमरावती, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदियात मेघगर्जनेसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे.
सिंधुदुर्ग, नाशिकचा पठारी भाग, धुळे, हिंगोली इथे जोरदार पावसाठी यलो अलर्ट आहे. तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























