ग्राऊंड रिपोर्ट : मेळघाटातल्या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू, 27 दिवसांनी पोस्टमार्टम; कोण जबाबदार?
17 वर्षांच्या राजेश बेठेकरच्या मृत्यूला कोण जबाबदार? मेळघाटातील हा आदिवासी विद्यार्थी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलमध्ये अकरावीत शिकत होता आणि हॉस्टेलमध्ये राहत होता.
ऑगस्टमध्ये आजारी पडल्यानंतर राजेशला घरी नेण्यात आलं. त्याची प्रकृती खालावल्यानंतर हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्याचा मृत्यू झाला.
राजेशच्या कुटुंबीयांनी शाळेने वेळीच उपचार केले नसल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागाने मात्र PHCमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारासाठी विलंब झाला नसल्याचं सांगितलं आहे.
राजेशसोबत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांचीही याच काळात तब्येत बिघडली होती. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी या विद्यार्थ्यांमध्ये उलट्या, हगवण आणि पोटदुखीसारखी लक्षणं असल्याचं सांगितलं.
दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या पाहणीत महर्षी पब्लिक स्कूलमध्ये आदिवासी आणि इतर विद्यार्थ्यांना वेगळं बसवलं आणि शिकवलं जात असल्याचं आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या निष्कर्षांच्या आधारे शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याचंही सांगण्यात आलं आहे.
महर्षी पब्लिक स्कूलने हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
राजेशच्या मृत्यूला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली, हे तपासातून स्पष्ट होणं बाकी आहे. मात्र या घटनेमुळे निवासी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा आणि त्यांच्याशी होणाऱ्या वर्तणुकीचे प्रश्न पुन्हा चर्चेत आले आहेत.
रिपोर्ट- नितेश राऊत
शूट- शार्दुळ गोळे
एडिट- शरद बढे
प्रोड्यूसर- प्राजक्ता धुळप
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






