You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या त्या?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रावरच थांबण्याचे आवाहन केले आहे.
ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हीडिओ जारी करत म्हटलं, "मी हात जोडून विनंती करते की, कोणत्याही 'व्होटिंग एजंट'ने मतमोजणी केंद्र सोडू नये. ही भाजपाची योजना आहे. निवडणूक आयोग आधी त्यांचे निकाल जाहीर करेल, त्यानंतर आपल्या पक्षाचे निकाल जाहीर करेल, हे मी कालपासून सांगत आहे."
"सुमारे 100 ठिकाणी मतदानाच्या 2-3 फेऱ्यांनंतर मतमोजणी थांबवण्यात आली आहे. कल्याणीमध्ये मोजणीच न झालेले 7 मशीन्स आढळून आले," असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, "केंद्रीय सुरक्षा दल तृणमूल काँग्रेसवर अत्याचार करत आहे. लोक आमच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी कार्यालयाचा ताबा घेतला आहे. एसआयआरच्या माध्यमातून लूटमार करून जागा कशा जिंकल्या जात आहेत, हे तुम्ही पाहिले आहे. आम्ही अजूनही 70-100 जागांवर आघाडीवर आहोत, पण त्याविषयी सांगितले जात नाहीये. सर्व काही खोटे सांगितले जात आहे."
"निवडणूक आयोग केंद्रीय दलांशी संगनमत करून स्वतःचा खेळ खेळत आहे. आमचे पोलीसही केंद्र सरकारशी संगनमत करून काम करत आहेत. मला पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की, दुःखी होण्याची गरज नाही. मतमोजणीच्या केवळ 3-4 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि 14-18 फेऱ्यांनंतर आपण जिंकू. वाट पाहा. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. आम्ही वाघासारखे लढत राहू," असंही ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.
सध्याच्या कलानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपा 192 जागांसह आघाडीवर आहे, तर टीएमसी 96 जागांवर पुढे आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)