You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
NEET परीक्षेची नवी तारीख जाहीर; पुढील वर्षीपासून होणार संगणकीकृत परीक्षा
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."
"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं होतं..
तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं होतं.
नव्या परीक्षेबाबत महत्त्वाच्या घोषणा
पुन्हा नव्याने होणाऱ्या परीक्षेबाबत काही महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत.
- नीट यूजी 2026 च्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जाणार नाही.
- ज्या दिवशी परीक्षा रद्द झाली, त्याच दिवशी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) शुल्क परत करण्याची घोषणा केली होती.
- सुरुवातीला, NTA ने विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी त्यांच्या पसंतीचे शहर पुन्हा निवडता यावे यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
- विद्यार्थ्यांची सोय आणि वेळेची मर्यादा लक्षात घेता, परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा आता नेहमीच्या दुपारी 2:00 ते सायंकाळी 5:00 ऐवजी दुपारी 2:00 ते सायंकाळी 5:15पर्यंत चालेल.
- सर्व उमेदवारांना 14 जूनपर्यंत परीक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येतील.
- केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या व्यवस्थेबाबत राज्यांशी चर्चा करेल.
- 21 जून रोजी हवामानात बदल होण्याची शक्यता लक्षात घेता, एनटीए पर्यायी व्यवस्थेचाही विचार करत आहे.
2027 मध्ये NEET संगणकीकृत परीक्षा
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याबाबत बोलताना 'गेस पेपर'च्या नावाखाली खरे प्रश्न फुटल्याचं सांगितलं.
"परीक्षा 3 मे रोजी झाली. त्यानंतर 7 मे रोजी NTA ला 'गेस पेपर'मधील काही प्रश्न या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेशी जुळत होते, अशी माहिती मिळाली. नंतर शासकीय यंत्रणांशी संपर्क साधला आणि परीक्षेचे खरे प्रश्न फुटले होते हे स्पष्ट झालं," असं ते म्हणाले.
गेल्या वेळच्या अनियमिततांनंतर राधाकृष्णन समितीची स्थापना करण्यात आली होती. 2025 आणि 2026 या दोन्ही परीक्षांमध्ये समितीच्या शिफारशींची "शब्दशः" अंमलबजावणी करण्यात आली. तरीही ही घटना घडल्याचं ते म्हणाले.
काळजी घेऊनही झालेल्या चुकीची जबाबदारी आम्ही घेतो. सीबीआय याच्या मुळाशी जाईल. या समस्येचं मूळ ओएमआर आहे. त्यामुळं पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा संगणकाद्वारे घेतली जाईल, असं प्रधान यांनी सांगितलं.
नाशिक पोलिसांनी काय सांगितलं होतं?
नाशिक शहर पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितलं होतं, "सकाळी राजस्थान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्याविषयी विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ."
"क्राइम ब्रांच युनिट 2 च्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. ते पथक आल्यावर या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल," अशी माहिती त्यांनी दिली होती.
"आरोपीने त्याचा वेश बदलला होता, केस कापले होते. त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती. मात्र, तांत्रिक कौशल्य आणि जिकिरीने तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं," असंही त्यांनी नमूद केलं होतं.
एनटीएने परीक्षा पुन्हा आयोजित करण्याबाबत म्हटलं होतं की, "ही परीक्षा पुन्हा कधी आयोजित केली जाईल याच्या तारखा आणि नव्याने जारी केल्या जाणाऱ्या प्रवेशपत्रांचे वेळापत्रक यासह पुढील सर्व सूचना, एजन्सीच्या अधिकृत माध्यमांद्वारे जारी केल्या जातील."
"उमेदवारांनी आणि पालकांनी केवळ या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा आणि समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या, खात्री नसलेल्या बातम्यांकडे किंवा वृत्तांकडे दुर्लक्ष करावे," असं आवाहन एनटीएनं केलं होतं.
दरम्यान, यानंतर या प्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल का?
पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागेल का यावर एनटीएनं म्हटलं होतं की, "मे 2026 च्या परीक्षा सत्रासाठी करण्यात आलेली नोंदणीची माहिती, उमेदवारीची स्थिती आणि उमेदवारांनी निवडलेली परीक्षा केंद्रे ही सर्व माहिती पुन्हा आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेसाठीही कायम ठेवली जाईल."
"यासाठी कोणत्याही प्रकारची नवीन नोंदणी करणे आवश्यक असणार नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले शुल्क त्यांना परत केले जाईल. ही परीक्षा एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून पुन्हा घेतली जाईल," असंही एनटीएनं नमूद केलं होतं.
परीक्षा नेमकी का रद्द करण्यात आली?
एनटीएनं 10 मे रोजी जारी केलेल्या निवेदनात नीट (यूजी) 2026 परीक्षेच्या संदर्भात कथित अनियमिततांबाबत राजस्थानच्या 'स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप'ने कारवाई सुरू केल्याची माहिती दिली होती. तसेच कारवाईविषयी एनटीएला पूर्ण कल्पना असल्याचंही नमूद केलं होतं.
या निवेदनात एनटीएनं म्हटलं होतं, "परीक्षा झाल्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 7 मे 2026 च्या उशिरा रात्री एनटीएला परीक्षेच्या संदर्भात कथित गैरप्रकारांविषयी काही माहिती मिळाली. या माहितीची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी आणि आवश्यक ती कारवाई करण्यासाठी एनटीएने 8 मे 2026 च्या सकाळीच ही माहिती केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवली."
"त्यानंतर कायदा अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी केलेली कारवाई ही त्या यंत्रणांच्या तत्पर कामगिरीचाच परिणाम आहे. अलीकडच्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांतून याबाबत अटकेचीही माहिती समोर आली आहे," अशी माहिती एनटीएनं दिली.
एनटीएनं 8 मे 2026 रोजी उपस्थित झालेल्या बाबींची स्वतंत्र पडताळणी आणि आवश्यक कारवाईसाठी हे प्रकरण केंद्रीय संस्थांकडे सोपवलं होतं.
आता सरकारने या संदर्भातील आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि चौकशीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य, रेकॉर्ड्स आणि इतर सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देऊ, असं एनटीएनं म्हटलं होतं
राजस्थानचे मंत्री किरोरी लाल मीना यांनी एएनआयला सांगितलं होतं, "प्रश्नपत्रिकेतील 320 पैकी 120 प्रश्न फुटले होते, असे म्हटले जात आहे. केरळ असो वा सीकर (राजस्थान), जो कोणी दोषी असेल तो यातून सुटू शकणार नाही."
"सरकारची संवेदनशीलता पाहा, पेपरफुटीची वस्तुस्थिती समोर येताच सरकारने तात्काळ परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशीचे आदेश दिले," असंही त्यांनी नमूद केलेलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)